पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी होत असताना तिला विरोध करणे दुर्दैवी आहे. या विरोध करणाऱ्यामागे कोण सूत्रधार आहेत हे शोधले पाहिजे. या पापाची फळे त्यांना भोगावी लागतील. पंढरपूरची जनता त्या लोकांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला असून पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी होणारच आहे. त्यासाठी वाटल्यास रस्त्यावर आंदोलनासाठी उतरू असेही धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंढरपूर तालुक्यात औद्योगिक वसाहत होणार असून त्यासाठी कासेगाव, रांजणी या गावातील जमिनीचा प्रस्ताव दिलेला आहे. दरम्यान बुधवारी कासेगाव येथील काही राजकीय मंडळींनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कासेगाव येथे एम आय डी सी होउ देणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून तालुक्यात एम आय डी सी होणार म्हणून निर्माण झालेल्या युवकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी गुरुवारी पंढरपूर मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी महादेव कोळी समाजाचे नेते अरुण कोळी, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, मनसे चे शशिकांत पाटील, संतोष कवडे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, नागेश इंगोले उपस्थित होते. यावेळी बोलताना धोत्रे यांनी, एम आय डी सी ला होत असलेला विरोध राजकीय असल्याचा आरोप केला. तसेच मेंढापूर, कासेगाव येथील या विरोधामागे कोण राजकीय शक्ती आहे याचा तालुक्यातील जनतेने शोध घ्यावा असे आवाहन केले.
यासंदर्भात पुढे बोलताना धोत्रे म्हणाले कि, पंढरपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पुणे, मुंबई इथे रोजगारासाठी लागते आहे. शेकडो घरात केवळ वयोवृद्ध आई वडील राहतात आणि त्यांची शिकलेली मुले पुण्य मुंबईला जाऊन मिळेल तो रोजगार करतात. अशी परिस्थिती असल्याने आ. समाधान अवताडे, मी स्वतः तालुक्यात एम आय डी सी व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहोत. या एमआयडीसी चे श्रेय आपल्याला मिळत नाही म्हणून कुणी याला विरोध करीत असेल तर ते दुर्दैवी आहे. अद्याप एमआयडीसी कोणत्या गावात होणार ते निश्चित नाही तोवरच एका गावातून विरोध केला जातो, म्हणजे दुसऱ्या पाहिजे अशी यामागे भूमिका आहे.
त्यामुळेच मागे मेंढापूर येथे एमआयडीसी होत असताना काहींनी विरोध केला. आताही कासेगाव येथील काही लोक हे विरोध करीत आहेत. भाजपचेच आमदार एमआय डीसी साठी प्रयत्न करीत असताना त्यांना विरोध करणारे कोण आहे याचा शोध घेतला जावा. अशी मागणी करून दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी होणारच असा निर्धार व्यक्त केला. प्रदूषणाचा बाऊ केला जातो आहे, मात्र हल्ली प्रदूषण विरहित यंत्रणा उपलब्ध असल्याने सध्या चालू असलेल्या एमआयडीसी बाबत प्रदूषणाच्या तक्रारी नाहीत. शिवाय एम आय डीसी ला मंजुरी देताना प्रदूषण नियंत्रन मंडळाकडून निकष ठरवले जातात. त्यामुळे एकही शेतकऱ्याचे एमआयडीसीमुळे नुकसान होणार नाही. याची काळजी आम्ही घेऊ, शेतकऱ्यांपर्यंत जाऊ, अधिकारी, युवक, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनाही विश्वासात घेऊन एमआयडीसी उभा करू, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल मात्र पंढरपूर तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून एमआयडीसीला होणार विरोध हणून पाडू असाही विश्वास धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांनी सांगितले कि, मुळात या एमआयडीसी साठी ज्या जमिनीचा प्रस्ताव दिला आहे ती जमीन खाजगी नाही, एकही शेतकऱ्याची जमीन जाणार नाही, समजा कुणी दिलीच तर त्यांना बाजारभावाच्या चौपट दर मिळणार आहे, शिवाय एमआयडीसी मध्ये त्याने दिलेल्या बदल्यात त्याला उद्योगासाठी १० टक्के जागा देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. केवळ राजकीय श्रेयासाठी विरोध होत असल्याचा आरोप घाडगे यांनी केला.