श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात उमेश पाटील बोलत होते. ते म्हणाले की, भारतनाना भालके यांच्यानंतर पंढरपुरात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. भालके यांच्या निधनामुळे विठ्ठल परिवार पोरका झाला आहे. पोरका झालेल्या विठ्ठल परिवाराला सांभाळण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्याची आवश्यकता हेाती. अभिजित पाटील यांच्या रूपाने आपण आशीर्वाद देऊन तसा कार्यकर्ता घडविला आहे.
विठ्ठल परिवार पंढरपूरच्या राजकारणाची दिशा आणि विधानसभेचा आमदार ठरवतो. आपण अभिजित पाटील यांना आशीर्वाद दिला आहे, ते सर्व जनतेला समजते आहे. पहिला कार्यक्रम अभिजित पाटील यांना देऊन काय द्यायचा तो मेसेज आपण दिला आहे. पण, अनेक खाचखाळगे भरण्याचे काम आपल्याला करावं लागणार आहे. अभिजित पाटील यांच्यासारखी माणसं आपल्याला शोधावी लागणार आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष उभा राहिला तर भाकरी फिरविण्याची आपण जी घोषणा केली आहे. ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरणार आहे, असेही उमेश पाटील यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले की, सोलापूर राष्ट्रवादीची भाकरी त्याच त्याच ठिकाणी फिरून करापयला लागली आहे. करपलेल्या भाकरीचा वाससुद्धा लोकांना आवडनेसा झालेला आहे. त्यामुळे आपण भाकरी फिरविण्याची इच्छा व्यक्त केली. पण, आमची इच्छा एकच होती की, भाकरी थापणारा जागेवर राहिला पाहिजे. भाकरी पाहिजे तर तव्यासकट बदलून टाका, त्याची सुरुवात आमच्यापासून करा. पण कर्तृत्वान सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देताना टीचभरसुद्धा मागे पाहू नका. कोणाला काय वाटतं, हे महत्वाचं नाही, तर जनतेला, सर्वसमान्यांना काय वाटतं, याला आपण महत्व द्यावं, अशी आमची अपेक्षा आहे.