विद्यमान महाविकास आघाडी सरकारला नुकतीच 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. ‘दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची’ या घोषवाक्यासह जिल्ह्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही जागर मोहीम बुधवार दि.9 मार्च 2022 पासून सुरू होत आहे.
गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना यांची माहिती जनतेला व्हावीत, यासाठी लोककलेच्या माध्यमातून प्रचार, प्रसिद्धी करण्यात येणार आहे. योजनांची माहिती जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या निवडसूचीतील तीन सर्वोत्कृष्ठ कलापथकांची निवड करण्यात आली आहे. कोरोना महामारीची साथ असताना महाविकास आघाडी शासनाने दोन वर्षात विविध जनकल्याणकारी निर्णय घेतले आहेत. रात्रीचा दिवस करून कोरोना महामारीत शासनाने नागरिकांना सेवा दिली. लागणाऱ्या क्षमतेपेक्षा ऑक्सिजन निर्मिती केली. कोरोना लसीकरण करून नागरिकांच्या जीविताची देखभाल घेतली. शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पीक विमा आणि आपत्तीच्या काळात मदतीचा हात दिला.
जिल्ह्यातील 63 गावात कलापथक आपल्या कलेच्या माध्यमातून शासनाने दोन वर्षात जनकल्याणकारी घेतलेल्या निर्णयाची माहिती पोहोचविणार आहेत. कोविडसंदर्भात आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाकडील सर्व सूचनांचे पालन करुन, आवश्यक खबरदारी घेऊन कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार असून हा जागर 17 मार्च 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.