सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. चेअरमन कल्याण काळे गटातील व विठ्ठल परिवारातील अनेक आजी, माजी संचालक काळे यांची साथ सोडून विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांना साथ देत असल्याचे दिसून येत आहे. नेत्यावर विश्वास राहिला नसल्याने सेनापती पळू लागले आहेत. यामुळे सभासद, कामगारांच्या हितासाठी अभिजीत पाटील व दिपक पवार एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.
सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणूकीसाठी चेअरमन कल्याण काळे, दिपक पवार, बी. पी. रोगे, अभिजीत पाटील गटाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यंदाच्या निवडणूकीत विक्रमी २६८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छाननीत ९२ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. १७६ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जून आहे. या नंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. साखर कारखाना निवडणूकीसाठी गेल्या आठ दिवसापासून प्रचार जोमाने सुरू आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. सत्ताधारी गटातील व विठ्ठल परिवारातील माजी संचालक अभिजीत पाटील गटात प्रवेश करीत आहेत. यात चळे येथील बापू गायकवाड, सहकार शिरोमणीचे माजी संचालक
बाळासाहेब कौलगी, विभीषण पवार यांचा समावेश आहे. चेअरमन कल्याण काळे यांनी कारखान्याचे सभासद व कामगार यांना अडचणीत आणल्याने कारखाना अडचणीत आला असा आरोप कौलगी च पवार यांच्याकडून केला जात आहे. साखर कारखाना निवडणूकीचा प्रचार रंगात आला असताना चेअरमन काळे यांची साथ सोडून अनेकजण अभिजीत पाटील गटात सामिल होत आहेत. यामुळे पाटील त्यांची ताकद वाढत असल्याचे दिसून येत आहे. नेत्याच्या कामावर विश्वास न राहिल्याने सेनापती पळून जात असल्यानेच अभिजीत पाटील व दिपक पवार एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत.