भाजपमधील अनेक नेते काँग्रेसच्या वाटेवर! नानाभाऊ पटोले
भाजप आणि शिवसेनेचे मागील अनेक दशकांपासून असलेली युती तोडून शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत हातमिळवणी करून सत्ता सथापन केली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप एकटे पडले गेले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला आहे की, भारतीय जनता पक्षातील अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय भूकंप कॉंग्रेस घडवणार का ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्र जोमाने लढतील, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केली. मात्र, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल,काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटलं, भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत, माझ्याकडे मोठी लिस्ट तयार आहे. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असलेले ते भाजप नेते कोण? असा सवालही विचारला जात आहे.
भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असंही पटोले यांनी स्पष्ट केले आहे.