सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोविड पीडित कुटुंबांना भरीव आर्थिक मदत द्या – प्रा. संग्राम चव्हाण,
किसान कॉंग्रेस
अलीकडेच सुप्रीम कोर्टाने कोविड पीडितांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत जाहिर करण्यासाठी केंद्र सरकारला गाईडलाईन्स तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.कोरोना महामारी मध्ये लाखो मध्यमवर्गीय व गरीब शेतकरी व कामगार कुटुंबांमधील सदस्यांना covid-19 ची लागण झाल्यामुळे त्या कुटुंबांची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. एकिकडे लॉक डाऊन मुळे हातातला रोजगार गेला व दुसरीकडे कोविड लागण झाल्यामुळे उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले. अगोदरपासून अडचणीत असलेल्या शेतकरी व कामगार कुटुंबांना कोविडची मोठी आर्थिक झळ बसली आहे.लॉक डाऊन कालावधीमध्ये मध्ये काही कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले होते. लॉक डाउन कालावधीमध्ये “सांगायचे कुणाला आणि ऐकणार कोण “अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना विविध सामाजिक संस्था, एनजीओ मानवतावादी दृष्टिकोनातून अशा पीडित कुटुंबांची उपासमार होऊ नये यासाठी झटल्या. त्यांचे हे काम खरंच खूप कौतुकास्पद आहे.परंतु अशा कोविड पीडित कुटुंबांप्रती सहानुभूती व एकुणच मानवतावादी दृष्टीकोन जपत त्या कुटुंबांना भरीव आर्थिक मदत देणे हे केंद्र सरकारचे आद्य कर्तव्य असून सुप्रीम कोर्टाने तशा सूचना केंद्र सरकारला दिल्या आहेत.तरी या सूचनांचे पालन करून केंद्र सरकारने अशा पीडित कुटुंबांसाठी त्वरित भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केली.
कोविड हॉस्पिटल्स मधून ऊपचारादरम्यान रुग्णाच्या कुटुंबीयांची भयंकर आर्थिक पिळवणूक केली गेली जात आहे. या महामारी मध्ये दुर्दैवाने रोगाला बळी पडलेल्या कुटुंबाच्या सदस्यांची सध्या ससेहोलपट सुरू झाली असून त्यांच्या डोक्यावर उपचारावर झालेल्या खर्चामुळे कर्जाचा डोंगर झाला आहे. अनलॉक सुरू झाले असले तरी बाजार पेठेतील मंदीमुळे लोकांच्या हाताला पुरेसे काम नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. पुढील शेती करण्यासाठी हातात भांडवल नाही. कर्ज काढून शेती सुरू करायची तर येणाऱ्या शेतमालाला योग्य हमीभावाची खात्री नाही. तर बॅंका कर्ज देत नाहीत. अशा विचित्र संकटामध्ये सर्व शेतकरी वर्ग सापडला असून कमीत कमी कोविड पीडित कुटुंबांना तरी केंद्र सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज त्वरित जाहीर करावे अन्यथा अशी कुटुंबे उद्ध्वस्त होतील असे मत सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.